संजीवनी अकॅडमीची चार्वी कोठारी देश पातळीवर गुजरात स्टेम क्वीज स्पर्धेत सर्व प्रथम -डाॅ. मनाली कोल्हे
गुजरात शिक्षण मंत्री श्री ऋषिकेश पटेल याचेकडून चार्वी सत्कार.
कोपरगांव प्रतिनिधी:-----
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी अकॅडमीच्या चार्वी योगेश कोठारीने गुजरात सरकारच्या सायन्स आणि टेक्नाॅलाॅजी विभागाने राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या ‘गुजरात स्टेम क्वीज’ या स्पर्धेत एकुण ५,४५,७६४ स्पर्धकांमधुन देशात सर्व प्रथम क्रमांक मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे अद्भुत दर्शन घडविले. गुजरात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री ऋषिकेषध पटेल यांनी चार्वी अहमदाबाद येथे रू १. ५ लाख किमतीचा लॅपटाॅप, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवुन, गुजरात विज्ञान व तंत्रज्ञान परिषदेचे सल्लागार श्री नरोत्तम साहु व गुजरात विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव श्री विजय नेहरा (भा. प्र. से.) यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार केला, अशी माहिती संजीवनी अकॅडमीच्या संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
डाॅ. कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की गुजरात सरकारच्या शास्त्र आणि तंत्रज्ञान संचालनालय व सीएसआर-टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने इ.९ वी ते १२ वीच्या विध्यार्थ्यांमध्ये सायन्स, टेक्नाॅलाॅजी, इंजिनिअरींग व मॅथेमॅटीक्स (स्टेम) या विषयांची गोडी लागुन दैनंदिन कामासाठी चांगला नागरिक बनविणे या हेतुने देश पातळीवर ही स्पर्धा घेण्यात येते. प्रथमतः ही स्पर्धा राज्य पातळीवर वेगवेगळ्या परीक्षा केद्राच्या मदतीने ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. त्यातुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी फक्त १० विध्यार्थी निवडण्यात आले. त्यात ४ विध्यार्थी एकट्या संजीवनी अकॅडमीचे होते. यात चार्वी सह परिमल दत्तात्रय आदिक, साईप्रसाद लक्ष्मण गवंडी व शाम्भवी अनिल देशपांडे यांचा समावेश होता. देशातील २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेश मधुन एकुण ५,४५,७६४ विध्यार्थ्यांनी भाग नोदविला. यामधुन विज्ञान भवन, सायन्स सिटी अहमदाबाद येथे राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी ९४० विध्यार्थी पुढे आले. या स्पर्धेसाठी शांभवी हजर राहु शकली नाही. तेथे चार्वी, परीमल व साईप्रसादने पहिल्या दोन फेऱ्या पुर्ण केल्या, तर चार्वीने थेट अंतिम फेरीत प्रवेश करून संपुर्ण देशात प्रथम क्रमांक मिळविला आणि संजीवनी अकॅडमीचे नाव पुन्हा एकदा देशाच्या शैक्षणिक पटलावर झळकविले. परीमल व साईप्रसाद यांनी उपांत्य फेरीत पहिल्या ३० क्रमांकात जागा मिळविली. त्यांनाही टॅबलेट (संगणकाचा एक प्रकार), रोबोटिक्स किट व दुर्बीन देवुन सन्मानित करण्यात आले. याच बरोबर चार्वी, परीमल व साईप्रसादला गुजरात सरकारच्या शास्त्र आणि तंत्रज्ञान संचालनालयाच्या वतीने भाभा आटोमॅटिक रिसर्च सेंटर, मुंबई, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो), बेंगलोर व भारतीय संरक्षण विभागाच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट आॅर्गनायझेशन-डीआरडीओ) या ठिकाणी क्षेत्र भेटींचे आयोजन करण्यात आले आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी चार्वी, परीमल, साईप्रसाद व शांभवी यांचे अभिनंदन केले आहे. तर डाॅ. मनाली कोल्हे यांनी चार्वीला रोख रू ५ हजाराचे बक्षिस देवुन गौरविले. यावेळी चार्वीचे आजोबा अॅड. जयचंद कोठारी, आजी पुष्पा कोठारी, आई श्वेता कोठारी, प्राचार्या शैला झुंजारराव, गुणवंत विध्यार्थी परीमल, साईप्रसाद व शांभवी उपस्थित होते.
0 Comments