आदर्श व्यवस्थापन करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर द्यावा – ना. आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी:------ विद्यालयाचे व्यवस्थापन पाहत असतांना मुख्याध्यापक कुठेही मागे राहू नये या उद्देशातून विद्यालयाचा कारभार पाहतांना कार्यालयीन स्तरावर येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आयोजित मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून व्यवस्थापनाचे धडे घेवून विद्यालयाचे आदर्श व्यवस्थापन करावे. आदर्श व्यवस्थापनाबरोबरच सर्व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर देखील भर द्यावा असे आवाहन रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी केले.
रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग यांच्यावतीने कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम. महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक मार्गदर्शन कार्यशाळेचे उदघाटन ना.आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.एस.जी.एम.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.सानप होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, शिष्यवृत्ती परीक्षेचा उत्तर विभागाचा निकाल अतिशय चांगला लागला हि समाधानाची बाब असून यामध्ये सातत्य टिकून ठेवण्यासाठी अजूनही मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे असून या मार्गदर्शन कार्यशाळेच्या माध्यमातून मुख्याध्यापकांकडून गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न झाल्यास या कार्यशाळेचा उद्देश सफल होईल. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या संस्थेत काम करण्याची संधी मिळणे हि भाग्याची गोष्ट असून या संस्थेच्या शाखेतील सर्वोच्च पदावर काम करतांना आपली जबाबदारी वाढली आहे याची जाणीव ठेवून उत्कृष्ठ व्यवस्थापना सोबत गुणवत्ता देखील महत्वाची आहे त्यामुळे व्यवस्थापना बरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर देखील भर द्यावा असे आवाहन ना. आशुतोष काळे यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक रयत शिक्षण संस्थेचे पुणे विभागीय अधिकारी राजेंद्र साळुंके यांनी केले. यावेळी सहाय्यक विभागीय अधिकारी काकासाहेब वाळुंजकर, शिवाजीराव तापकीर, एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर.सानप, कार्यशाळेचे तज्ञ मार्गदर्शक एम.के. जाधव, एस. एल. ठुबे, जी.टी. गमे, एस.व्ही. काळे, एस.आर.उगले, डी. एन. नाईक, एस.एस. बोडखे, तसेच विविध माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती छाया शिंदे यांनी केले तर आभार उपप्राचार्य रामभाऊ गमे यांनी मानले
0 Comments