शिळ्या कढीला उत आणून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करायची कोल्हेंची जुनीच सवय.
----- सुधाकर रोहोम
कोपरगाव प्रतिनिधी:----- पाच वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतांना त्यांनी मनात आणले असते कोपरगावचे नंदनवन करणे सहज शक्य होते. मात्र सत्ता असतांना कामे करता आली नाही आणि आता आमदार आशुतोष काळे यांनी कोणत्याही विकासकामांना मंजुरी आणल्याचे सांगायचा उशीर की, ती मंजुरी आमच्यामुळेच असा माजी आमदार कोल्हेंकडून डांगोरा पिटला जात असला तरी शिळ्या कढीला उत आणून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करायची कोल्हेंची जुनीच सवय असल्याची खरमरीत टीका कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्यावर दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून आरोग्य मंत्रालयाने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला आहे. त्याबाबत यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्याचा खुलासा विविध प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीसमोर यापूर्वीच केला आहे. मात्र कोणतेही योगदान नसतांना चर्चेत राहण्यासाठी आपल्या चेल्यांना पुढे करून माजी आमदार आजही श्रेय घेण्यासाठी धडपड करीत आहे. त्याबाबत उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी आमदार आशुतोष काळे यांनी ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याचा सविस्तर तपशील दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात मांडला आहे.आ.आशुतोष काळे यांच्या सूचनेवरून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाने जिल्हा शल्यचिकित्सक अहमदनगर यांच्याकडे पाठविला होता. त्यांच्याकडून आरोग्य उपसंचालक नासिक यांचेकडे पाठविण्यात आला. त्यांच्याकडून हा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव यांच्याकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्याबाबत आ. आशुतोष काळे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक अहमदनगर, आरोग्य उपसंचालक नासिक व आरोग्य विभागाचे अवर सचिव यांच्या कार्यालायची उंबरे झिजविली आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच जलसंपदा खात्याबरोबरच आरोग्य मंत्रालयाचा कारभार सांभाळत असलेले ना. जयंतरावजी पाटील यांना १७ डिसेंबर २०१९ रोजी व त्यानंतर आरोग्य विभागाचा स्वतंत्र कारभार पाहत असलेले आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांना १५ जानेवारी २०२० रोजी अशी दोन पत्र कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा याबाबत दिली आहेत. त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देवून ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याचे मान्य केले होते. त्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांची देखील भेट घेवून त्यांच्यापुढे मतदार संघाच्या आरोग्य व्यवस्थेच्या समस्या मांडल्या असता त्यांनी देखील आरोग्य मंत्रालयाला श्रेणीवर्धन करण्याच्या त्यावेळी सूचना दिल्या होत्या.तेव्हापासून आमदार आशुतोष काळे यांचा अविरतपणे पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातूनच आरोग्य मंत्रालयाने दखल घेवून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे.तरीदेखील खोटं बोल पण रेटून बोल यापद्धतीने माजी आमदार श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. एवढे सांगूनही त्यांच्या मनाचे समाधान होणार नसेल तर जिल्हा शल्यचिकित्सक अहमदनगर, आरोग्य उपसंचालक नासिक व आरोग्य विभागाचे अवर सचिव यांच्या कार्यालयात जावून ग्रामीण रुग्णालयाला श्रेणीवर्धन व्हावे यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्याची कागदपत्र जाड भिंगाच्या चष्म्याने पहावीत असा टोला रोहोम यांनी माजी आमदार कोल्हे व त्यांच्या चेल्यांना लगावला आहे
0 Comments