कोपरगाव तालुक्याच्या विकासाआड येणाऱ्या येड्या बाभळी समूळ नष्ट होतील – नगरसेवक मेहमूद सय्यद
कोपरगाव प्रतिनिधी :------ कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास व्हावा ही प्रत्येक शहरवासीयांची ईच्छा आहे. मात्र काहींनी आपल्या परंपरेला साजेसं काम करून आजवर अनेक विकासकामांना विरोध केला आहे. त्यामूळे यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करणे म्हणजेच येड्या बाभळीच्या झाडाकडून आंब्याच्या फळाची अपेक्षा करण्यासारखे आहे. त्यामुळे येणाऱ्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत विकासाच्या आड येणाऱ्या या येड्या बाभळी समूळ नष्ट होतील असे अपक्ष नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद यांनी कोल्हे गटाच्या सत्ताधारी नगरेसवकांचे नाव न घेता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे की, कोपरगावला होणारी एमआयडीसी,आरटीओ ऑफिस, प्रांत कचेरी पळून लावण्याचे काम कोणी केले, कोपरगाव बेटाला जोडणाऱ्या लहान पुलाला विरोध, बांगडी चाळीवरील शॉपिंग सेंटर, भाजी मार्केट वरील शॉपिंग सेंटर, साईबाबा शॉपिंग सेंटर, टिळकनगर येथील खोका शॉपला विरोध अशा अनेक विकास कामांमध्ये अडथळा आणण्याचे काम करून त्यांनी शहर भकास करून ठेवले आहे. इतकेच नव्हे तर कोपरगांवच्या वैभवात भर घालणाऱ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला देखील विरोध करण्याचे घोर पाप सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरेसवकांनीच केले आहे. त्याचबरोबर ४ व ५ नंबर साठवण तलावाला विरोध करून शहरवासियांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम यांनीच केले आहे. त्यामूळे यांच्या कडून चांगल्या कामाची अपेक्षा करणे साफ चुकीचे असून २८ विकास कामांना विरोध करण्यासाठी यांनी हाय कोर्टातून आणलेली स्थगिती त्यांच्या परंपरेला साजेशीच आहे. त्यामूळे नागरिकांना यात वाईट वाटण्याचे काही कारण नाही. मात्र येणाऱ्या नगरपलिका निवडणुकीत कोपरगांवची जनता यांना याची जागा दाखवून देवून यांनी विरोध केलेली विकास कामे नक्की मार्गी लागतील.
कोपरगाव शहराच्या विकासाला माजी आमदारच विरोध करीत आहे. त्यांच्या विकृत प्रवृत्तीने कोपरगांवच्या पाणी आंदोलनात निर्दोष शिवसैनिकांवर त्यावेळेस खोट्या केसेस झाल्या व ५२ दिवस जेल मध्ये राहावे लागले त्यातील मी एक आहे. २५ वर्षे केस चालवली. परंतु आम्ही हुकुमशाही पुढे झुकलो नाही तर आमची सर्वांची निर्दोष सुटका झाली व सत्याचा विजय झाला हे मी गर्वाने सांगू शकतो. काही महिन्यांवर येवून ठेपलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत आपले पराभवाचे ढग कोल्हे गटाला व त्यांच्या नगरसेवकांना दिसत असल्यामुळे आपल्या नेत्यांच्या आदेशानुसार ते जाणून बुजून शहरविकासाला आडवे येत आहेत. त्यांना येत्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत सुज्ञ जनता आडवे केल्याशिवाय राहणार नाही. कोपरगाव शहराच्या विकासात आडवा येणारा परंपरागत नकारात्मक व्हायरस व कोपरगावच्या अधोगतीला कारणीभूत ठरणारी विघातक प्रवृत्ती असलेली या येड्या बाभळी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत शहरातील सुज्ञ मतदार एकत्र येऊन मुळासकट समूळ नष्ट करतील असे सय्यद यांनी शेवटी म्हटले आहे
0 Comments