आपल्या मुलांचे संगोपन करतो त्याप्रमाणे या वृक्षांचे देखील संगोपन करावे:आमदार आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी:----- वैश्विक कोरोना महामारीने निर्माण झालेल्या अभूतपूर्व जीवघेण्या संकटात मानवाला ऑक्सिजनचे महत्व दाखवून दिले आहे. सातत्याने होत असलेली वृक्षतोड व कमी झालेले वृक्षारोपण यामुळे निसर्गाचा समतोल ढासळला आहे. वृक्षांची संख्या कमी होत असल्यामुळे हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढणार आहे. त्याचा देखील विपरीत परिणाम मानवी जीवनावर होणार आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वेळीच पावले उचलली गेली नाही तर भविष्यात मानवाला ऑक्सिजन सिलेंडर सोबत घेऊन फिरण्याची वेळ येऊ नये यासाठी या पुढील काळात वृक्षलागवडीला महत्व देवून वृक्ष लागवड हे आपले आद्य कर्तव्य समजून वृक्ष लागवड करावी व ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांचे संगोपन करतो त्याप्रमाणे या वृक्षांचे देखील संगोपन करावे असा मौलिक सल्ला आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी दिला.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून कोपरगाव तालुक्यात १० हजार वृक्षांची लागवड करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा प्रातिनिधिक स्वरुपात प्रारंभ मढी बु. येथे आमदार काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, फुकटात ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांचे महत्व किती मौलिक आहे हे आजवर मनुष्याने कधीच गांभीर्याने घेतले नाही. मात्र जीवावर बेतणाऱ्या कोरोना संकटात पैसे देवून देखील ऑक्सिजनची नितांत गरज असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांना कुत्रिम ऑक्सिजन वेळेवर मिळत नव्हता त्यावेळी आपल्याला वृक्षांची महती समजली. वृक्ष लावा, वृक्ष जगवा अशी चळवळ अनेक सामाजिक संस्था मागील अनेक वर्षापासून राबवत आहेत. निसर्गाचा बिघडलेला समतोल सावरला जावून, वृक्ष लागवडीला चालना मिळावी यासाठी ही जनजागृती केली जात आहे. मात्र त्याकडे सोयीस्करपणे मानव दुर्लक्षच करीत आला आहे. परंतु वृक्षांमुळे मिळणाऱ्या नैसर्गिक ऑक्सिजनचे महत्व मानवासाठी अनन्यसाधारण आहे हे न दिसणाऱ्या कोरोना विषाणूने मानवाचे डोळे उघडले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. नागरिकांनी नियम पाळले नाही तर दुसऱ्या लाटेपेक्षाही तिसरी लाट घातक ठरू शकते. अनलॉकच्या दिशेने आपली वाटचाल सुरु झालेली आहे त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर असणारे निर्बंध कमी होणार असले तरी जास्त गर्दी करू नका. कोरोना महामारी संपलेली नाही त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांना जातांना शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन केले.
यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे,संतुजी गवळी, सरपंच प्रवीण निंबाळकर, निवृत्ती गवळी, गोदावरी खोरेचे संचालक सुभाष गवळी,कोळगाव पाटी सोसायटीच्या चेअरमन सौ. पुष्पाताई कुऱ्हाडे, व्हा. चेअरमन तुकाराम चव्हाण, रामराव गवळी, चिमण गवळी, पाराजी गवळी, माधवराव गवळी, ज्ञानदेव कुऱ्हाडे, सुनील मोकळ, राहुल जगधने, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे संचालक, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,सामाजिक वनीकरण विभागाच्या सौ. पूजा रक्ताटे,ग्रामसेवक रामेश्वर नेवगे, सोसायटीचे सेक्रेटरी एन.व्ही.राजगुरू व ग्रामस्थ उपस्थित होते
0 Comments