निर्बंध शिथील करून कोपरगावची बाजारपेठ संपुर्ण खुली करा.
सौ स्नेहलाता कोल्हे यांची जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी.
![]() |
कोपरगाव प्रतिनिधी:----- कोरोना महामारीमुळे कोपरगावातील बाजारपेठ अनेक दिवसापासून बंद असुन छोटया मोठया व्यावसायिकांचे मोठया प्रमाणात हाल होत आहे. त्यामुळे कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर असलेले निर्बंध शिथील करून कोपरगावची संपुर्ण बाजारपेठ खुली करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी जिल्हाधिकारी डाॅ राजेंद्र भोसले यांचेकडे केली आहे.
देशासह राज्यात आलेल्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून गेल्या अनेक दिवसापासून लाॅकडाउन करण्यात आलेेले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. बाजारपेठा बंद असल्यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हातावर पोट असलेली अनेक कुटुंबांची उपासमार होत आहे. एकिकडे कोरोना आजार आणि दुसरीकडे उपासमार अशा दुहेरी संकटात नागरीक सापडलेले आहे. छोटया मोठया व्यवसायावर गुजराण करणा-या अनेक कुटूंबांना मोठया आर्थीक संकटाचा सामना करावा लागत आहे.
सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू असुन खते,बी-बियाणे घेण्यासाठी शेतकरी बांधव खेडयापाडयातून येत असतात. शेतीपुरक साहित्य खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकरी बांधवाना बाजारपेठ बंद असल्याने इतर खरेदी करता येत नाही. वास्तविक सकाळच्या वेळेत काही दुकाने उघडी असतात, परंतु त्याच कालावधीमध्ये गाव खेडयामधील शेतक-यांची कामाची वेळ असते. दूध-चारापाणी, इतर कामे करत त्यांची सकाळची वेळ निघून जाते. तो पर्यंत इकडे दुकाने बंद होण्याची वेळ होते, त्यामुळे जीवनावश्यक वस्तु तसेच शेतीपुरक साहित्याच्या खरेदी करता येत नाही. गेल्या अनेक दिवसापासून बाजारपेठ बंद असल्याने सर्वांवर मोठे आर्थिक संकट आलेले आहे. सध्या रूग्णांची संख्याही कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तु विक्रेत्या दुकानांबरोबर इतर सर्वच दुकाने सुरू केल्यास अर्थकारणाला गती मिळेल. याबाबत त्वरीत कार्यवाही करावी, अन्यथा पुन्हा आर्थीक संकट उभे राहण्याची शक्यता आहे. बाजारपेठ बंद असल्यामुळे व्यापा-यांनाही मोठा फटका बसला आहे, काही प्रमाणात आर्थीक संकटातून बाहेर काढण्यासाठी निर्बंध शिथील करून संपुर्ण बाजारपेठ खुली करावी, अशी मागणी सौ कोल्हे यांनी केली
0 Comments