ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याची भूमिका सर्वप्रथम काळे कारखान्याने घेतली - आमदार आशुतोष काळे
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ६६ व्या गळीत हंगामाची सांगता
कोपरगाव प्रतिनिधी:------ सहकारी साखर कारखानदारीला संकटे नवीन नाहीत मात्र आजपर्यंत आलेल्या सर्व संकटाचा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने नेहमीच यशस्वी सामना करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याची भूमिका जिल्ह्यात सर्वप्रथम कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आजवर घेत आला असून यापुढेही ही परंपरा अशीच पुढे सुरू राहणार असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी कारखान्याच्या २०२०/२१ च्या ६६ व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी केले.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ६६ व्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली व्हा. चेअरमन सुधाकर रोहोम यांच्या शुभहस्ते श्री सत्यनारायण महापूजा करून करण्यात आली. याप्रसंगी आ.आशुतोष काळे बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या आदर्श विचारांवर व कारखान्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकरी, कामगारांबरोबरच सर्वच घटकांचेहित जोपासत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. १७५ दिवस चाललेल्या गळीत हंगामात विक्रमी ६ लाख ८८ हजार ७८४ मे. टन गाळप झाले असून ७ लाख २९ हजार ८०० साखर पोती उत्पादन झाले असून साखर उतारा १०.६०% मिळाला आहे. कारखान्याची मशिनरी जुन्या तंत्रज्ञानावर आधारित असूनसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे तांत्रिक रिझल्ट मिळाले हि समाधानाची बाब आहे. येणाऱ्या काळात कोरोनाचे संकट मोठे असले तरीही आपल्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची काळजी घेऊन पुढील कामकाज करावे लागणार आहे.जुन्या यंत्रणेचा वापर करून अतिशय चांगले उत्पादन घेतले आहे त्यामुळे जरी गाळप थोडे कमी झाले असले तरी गाळपापेक्षा रिकव्हरी अत्यंत महत्वाची असते. त्याबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊसाचा भाव देणे देखील तेवढेच महत्वाचे असते. त्यामुळे ऊस दराच्या बाबतीत यापूर्वीही कधीही कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना मागे राहिला नाही व यापुढेदेखील कधीही मागे राहणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक दर देण्याची भूमिका आजपर्यंत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने सर्वप्रथम घेत आला आहे व त्याचे अनुकरण इतर कारखाने करत असल्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जादा ऊस दर मिळण्यात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. येणारा २०२१/२२ चा गळीत हंगाम हा फार मोठा राहणार आहे. शेतकी खात्याच्या अंदाजानुसार मोठ्याप्रमाणावर ऊस लागवड झालेली असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप पाहता त्याअनुषंगाने येणाऱ्या गळीत हंगामा पुढे आव्हाने देखील तेवढीच मोठी असणार आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करत २०२०/२१ चा गळीत हंगाम कारखाना व्यवस्थापनाने नियोजनबद्ध काम करून यशस्वी केला असून पुढील गळीत हंगाम देखील अशाच पद्धतीने यशस्वी पार पाडण्यासाठी आत्तापासूनच तयारीला लागावे अशा सूचना करून गळीत हंगाम अतिशय चांगल्याप्रकारे यशस्वी केल्याबद्दल सर्व सभासद, कर्मचारी, अधिकारी त्याचप्रमाणे गोदावरी खोरे व गौतम केन ट्रान्सपोर्टच्या सर्व ट्रकधारकांचे आभार मानले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगता समारंभ अतिशय साध्या पद्धतीने पार पडला यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप,जनरल मॅनेजर सुनिल कोल्हे,आसवणीचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे,सेक्रेटरी बी.बी.सय्यद, असी. सेक्रेटरी एस.डी. शिरसाठ, तसेच सर्व अधिकारी सोशल डिस्टन्सिं ठेवून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनरल मॅनेजर सुनिल कोल्हे यांनी केले तर आभार सेक्रेटरी बी.बी.सय्यद यांनी मानले.
0 Comments